शेताच्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा वाद कागदी घोड्यात अडकला !
शेतकऱ्याने पुन्हा केली भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार
कामठी तालुक्यातील लिहीगाव येथील घटना
कामठी: शेतीचा पंचनामा चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे शेताच्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा वाद कागदी घोड्यात अडकला आहे. कामठी तालुक्यातील लिहीगावात राहणाऱ्या उमराव रामा डोंगरे यांच्या शेताचा हा वाद असून कामठी भूमी अभिलेख कार्यालयात नव्याने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे.
सविस्तर बातमी अशी की, उमराव रामा डोंगरे यांची लिहीगाव येथे शेती आहे. त्यांच्या शेताच्या पाणंद रस्त्यावर अशोक चैतलाल ठाकरे, सुकचंद बाजीराव बिसने, श्रीकांत राजु चापके, विनायक देवराव ठाकरे यांनी अतिक्रमण केले आहे. शेतातील पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात शेतमालक उमराव रामा डोंगरे यांनी २५ मे २०१६ रोजी महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, ग्रामपंचायत येथे लेखी तक्रार केली होती. मात्र मौका चौकशी करायला आलेल्या तलाठी व राजस्व मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल तयार केल्यामुळे कामठीचे तहसिलदार अक्षय पोयाम यांनी डोंगरे यांच्या शेतावर झालेले अतिक्रमण हटविले नाही. यासंदर्भात तहसिलदार पोयाम यांनी शुक्रवार (२४ जून) रोजी पिडीत शेतकरी डोंगरे यांना हि बाब लक्षात आणून दिली. शेतमालक डोंगरे यांनी तात्काळ भूमी अभिलेख कार्यालय कामठी येथे तक्रार करुन पुन्हा पंचनामा करण्याची विनंती केली. डोंगरे यांच्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटविणार असल्याचे आश्वासन तहसिलदार अक्षय पोयाम यांनी दिले आहे.