नागपूर : स्व. वसंतराव नाईक हे दूरद्रष्टे होते. विरोधाला न जुमानता अपर वर्धा सारखी धरणे बांधून त्यांनी लोकांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. आज धान्याची कोठारे भरली आहे. त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे, असे मत खासदार व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक फाऊंडेशन व वनराई फाऊंडेशन नागपूर द्वारे आयोजित हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रयोगशील शेती पुरस्कार – 2022 प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी शिशिर दिवटे यांना वितरीत करण्यात आला. खासदार व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी 21 हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन दिवटे यांना सन्मानित केले. यंदाचे पुरस्काराचे हे पाचवे वर्ष होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराई फाऊंडेशने अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. मंचावर रमेश बंग, निलिमा दिवटे, अनंत घारड, आत्माराम नाईक, डॉ. पिनाक दंदे, जयश्री राठोड, संजय पडलेवार, निलेश खांडेकर, राजू चव्हाण यांचीही उपस्थिती होती.
अनिल बोंडे म्हणाले, आज लोकांना शेतीबद्दल आपुलकी वाटायला लागली असून डॉक्टर, बिल्डर, उद्योजक निदान कर वाचवण्यासाठी शेतीकडे वळू लागले आहेत. शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले, दिवटे यांच्यासारखे विविध प्रयोग करून शेतीला आयटीपेक्षाही अधिक लाभदायी केले तर तरुण वर्ग निश्चितपणे त्याकडे आकर्षित होईल. एकेकाळी देश मिलो ज्वारी, लाल गहू खात होता, आज देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला असून त्याचे पूर्ण श्रेय शेतक-यांना जाते. शेतक-यांना उत्पादन वाढवण्यास सांगितले गेले पण त्यांचे उत्पन्न मात्र वाढले नाही. उद्योगापेक्षाही शेती आज अधिक रोजगार निर्मिती करत असली तरी जीडीपीमध्ये शेतीचा वाटा 14 ते 18 टक्केच आहे. त्यामुळे शेतकरी गरीब राहिला आहे. हा एकमेव असा असुरक्षित असा व्यवसाय आहे, असे ते म्हणाले. शेती विकू नका, शेतीला चांगले दिवस येणार आहेत, असे आवाहनही त्यांनी शेतक-यांना केले.
वसंतराव नाईकांनी देशाच्या पोशिंद्याला न्याय देण्याचे काम केले असे सांगताना रमेश बंग यांनी शिशिर दिवटे यांच्या कार्याचे कौतूक केले. बांधकाम व्यावसायिक असून देखील दिवटे शेतीकडे कळले आणि शेतीत विविध प्रयोग करून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्यासारखे शेतकरी तयार झाले तर तालुका, जिल्हयाचे नाव मोठे हाईल व देशाची अन्नाची समस्या सुटेल, असे ते म्हणाले.
डॉ. गिरीश गांधी अध्यक्षीय भाषणातून शिशिर दिवटे यांनी केलेल्या केळी, स्ट्रॉबेरी, गुलाबाच्या फुलांच्या प्रयोगशील शेतीचे कौतूक केले. ते म्हणाले, विदर्भातील शेतक-यांच्या प्रयोगात्मक कार्याची सरकारी स्तरावर दखल घेतली पाहिजे. चांगल्या प्रयोगांचा स्वीकार केला पाहिजे. दिवटे यांनी देशातील उत्कृष्ट तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरले असून उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन घेतले आहे. राज्यात, देशात जिथेही असे समाजोपयोगी प्रयोग होत असतील त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
वाळवंटात नंदनवन फुलविणारे शिशिर दिवटे यांनी सत्काराला उत्तर देताना हा पुरस्कार अमूल्य असल्याचे सांगितले. त्यांनी शेतीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांची यावेळी माहिती दिली. विदर्भातील महाविद्यांमध्ये मिळणारे पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष कार्यानुभव यामध्ये खूप तफावत आहे. शेती लाभदायी ठरेल तेव्हाच तरुण वर्ग याकडे वळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राष्ट्रभाषाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सलग 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नाईक यांनी कृषी विकासाचा ध्यास घेतला होता. शेतीविषयीचे त्यांचे प्रेम, शेतक-यांबद्दलचा आदर आणि कृषीप्रधान राज्य बनवण्याचं त्यांचे स्वप्न होते. ते गिरीश गांधी पूर्ण करीत असल्याचे मत मांडले.
डॉ. पिनाक दंदे यांनी सत्कारमूर्तीचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती पाटील यांनी केले. निलेश खांडेकर यांनी आभार मानले. सौरभ मगरे, सुचित्रा नशिने, सुधीर कपूर, अतुल कंगाले, राजेश कुंभलकर, रवी गाडगे, नितीन गेडाम, हरविंदर सिंग मुल्ला, सुरेंद्र रामटेके या वसंतराव नाईक फाउंडेशनच्या पदाधिका-यांची यावेळी उपस्थिती होती.