नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दुसरा टप्पा !
नागपूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये तर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये दुसरा आणि तिसरा टप्पा होणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील १८ महानगर पालिका, २५ जिल्हा परिषदा, २ हजार १६४ नगरपरिषदा, २८४ पंचायत समित्या, ८ ते १० हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूका अध्यापही प्रस्तावीत आहेत. मनुष्यबळ व आचारसंहितेचा कालावधी विचार करता या सर्वच निवडणूका तीन टप्प्यात होणार आहेत, अशी सुत्रांनी दिलेली माहिती आहे.
जळगाव, पुणे, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर, बुलढाणा या जिल्ह्यातील जवळपास दोन हजार १६४ नगरपरिषदा व नगरपंचायती, नगरपालिकांसह २८४ पंचायत समित्या आणि डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत मुदत संपणाऱ्या जवळपास आठ ते दहा हजार ग्रामपंचातींचीही निवडणूक घ्यावी लागणार आहे. ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळाल्याने व पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने केलेला प्रभागरचनेतील बदल शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्याने आरक्षण व प्रभागरचनेची प्रक्रिया पुन्हा नव्याने पूर्ण करावी लागणार आहे.
त्यासाठी किमान २० ते २२ दिवस लागणार आहेत. मार्च महिन्यात मुदत संपूनही अद्याप जिल्हा परिषदा व महापालिकांची निवडणूक झालेली नाही. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. हि लोकशाहीच्या विरोधात आहे. संविधानानुसार कालावधीमध्ये निवडणूका व्हायला हवी. मात्र महाराष्ट्रात सर्वच काही लोकशाहीच्या विरोधात होताना दिसत आहे. मात्र आता निवडणुक आयोग सक्रिय झालेला असून ऑगस्ट अखेर आरक्षण, प्रभाग निश्चिती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.