महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांनी मतदारांचा अपमानच केला : राज ठाकरे
नागपूर : निवडणूका झाल्या, निकाल लागले मग हे नवीन काय काढलं. मग लोकांनी तुमचा खेळचं बघत बसायचा का, लोकांनी दोन दोन तास रांगेत उभं राहून तुम्हाला मतदान करायचं आणि ते केल्यानंतर हे तुमच्याशी वाट्टेल तशी प्रताडणा करणार. म्हणून मला वाटतं हा फक्त विदर्भाचा प्रश्न नाही तर हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. ज्यांनी यांना मतदान केलं या मतदारांचा त्यांनी अपमान केलाय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज नागपूरातील रविभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ” १९८९ सालची गोष्ट असेल, शिवसेना-भाजप युतीच्या सुरवातीला, मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन होतो असे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि भाजपचे प्रमुख नेते यांनी ठरवलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री.
लोकशाहीत आतापर्यंत मतदारांची इतकी प्रतारणा कोणीही केली नव्हती, पण तुम्ही युती-आघाड्या करुन निवडणूका लढवता, लोकं तासनतास रांगेत राहून मतदान करतात. लोकासमोर एक गोष्ट सांगता, तुमचं ऐकून लोक तुम्हाला मतदान करत असता. पण निकाल लागल्यावर कोणीतरी सकाळचा शपथविधी करतो. लोकांनी या सगळ्यांचा हा खेळ बघत राहायचे का. त्या मतांचा हा अपमान आहे. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
१९९५ ते ९९ च्या काळात चार साडेचार वर्षांत भाजपने मुख्यमंत्रीपद मागितल्याचं कधीच आम्ही पाहिलं नाही, हा फॉर्म्युला ठरला होता तर मग अचनाक निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद कसं मागितलं. असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी तुम्ही आधीच का नाही सांगितल्या. जर नरेंद्र मोदी, अमित शहा हे व्यासपीठावर बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे बोलत असतानाच उद्धव ठाकरेंनी तेव्हाच आक्षेप का नाही घेतला, असे राज ठाकरे म्हणाले.